विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीद्वारे निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.